हकनाक बळी (अग्रलेख)   

रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानंतरचा बंगळुरुमधील विजयोत्सव आणि त्याला झालेली बेसुमार गर्दी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचेच उदाहरण ठरते; मात्र या सगळ्या उन्मादात अकरा जणांचे विनाकारण बळी गेले.
 
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील क्रिकेटपटूंच्या विजयोत्सवाच्या वेळी झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आहे. योग्य नियोजनाअभावी ती घडली; मात्र ती टाळता आली असती. आता या घटनेची रीतसर चौकशी होईल, त्यात दोषी कोण हे उघड होईल, शिक्षेचे सोपस्कार होतील, काही दिवसांनी हे सारे विस्मरणात जाईल. रॉयल चॅलेंजरच्या आयपीएल २०२५ मधील विजयानंतर सारे बंगळुरु शहर जल्लोषमय झाले होते. रॉयल चॅलेंजर्स संघाच्या या विजयोत्सवाचे आयोजन चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले होते. स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा काही लाखाहून अधिक जमलेल्या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचे बळी गेले. आता या चेंगराचेंगरीत अनेक कारणे समोर येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन ऐनवेळी झाल्याचे सांगण्यात येते. या कार्यक्रमासाठी तिकीट ठेवण्यात आले होते; मात्र हा कार्यक्रम मोफत असल्याची अफवा पसरली आणि प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा कित्येक पट अधिक क्रिकेट शौकीन तेथे आले होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या सरबराईत गुंतलेल्या पोलिसांना नियंत्रणाबाहेर गेलेल्या अतिउत्साही गर्दीला आवर घालता आला नाही. स्टेडियमची क्षमता तीस पस्तीस हजार प्रेक्षकांची असताना स्टेडियमवर दोन ते तीन लाख लोक जमले होते. मोफतच्या प्रवेशासाठी गर्दी उसळली. अनेकजण जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसले. प्रवेशद्वारे तोडण्यात आली. स्टेडियमभोवती असलेल्या काटेरी कुंपणातून घुसण्याचा प्रयत्न झाला. प्रचंड गर्दीपुढे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हतबल ठरली. बॅरीकेड्स तोडून लोक आत घुसले. आता या घटनेनंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. या दुदैवी घटनेस विराट कोहली जबाबदार असल्याचाही आरोप झाला. बीसीसीआय आणि आयपीएलने या संपूर्ण घटनेपासून स्वतःला अलिप्त ठेवले. या कार्यक्रमाचे नियोजन करणारी इव्हेंट मॅनेजमेंट आणि बंगळुरुमधील पोलीस प्रशासन ही घटना रोखण्यात अपयशी ठरली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार के. गोविंदराज यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे; तर गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याप्रकरणी अतिरिक्त पोलिस महासंचालकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आरसीबी आणि डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंटच्या चार अधिकार्‍यांनाही अटक झाली आहे.

नियोजनाचा पत्ता नाही!

चिन्नास्वामी स्टेडियमवरील घटनेमुळे क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि गर्दीच्या नियोजनातील अक्षमता हे मुद्दे अधोरेखित झाले आहे. प्रशासन व्यवस्थेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. खरे तर आरसीबीने पोलिसांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले नसते तर ही घटना टाळता आली असती. आदल्या दिवशी झालेल्या आयपीएल सामन्यातील विजयानंतर लगेचच हा विजयोत्सव साजरा करण्याचे कारण नव्हते. हा विजयोत्सव आणखी आठवडाभराने पुढे साजरा केला गेला असता, तर आभाळ कोसळले नसते; परंतु या सल्ल्याकडे संबंधित इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेने सपशेल दुर्लक्ष केले. या समारंभाआधी खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्याचेही ठरले होते. तसे झाले असते तर शहरातील वाहतूक व्यवस्थेचेही तीन तेरा वाजले असते. यातही आणखी दुर्दैवी प्रकार म्हणजे बाहेर गर्दीत लोक एकमेकांना तुडवत जात होते, त्यात काहींचे बळी जात होते तरीही आरसीबीचे खेळाडू आणि राजकीय नेते आत उत्सव करीत होते. जेव्हा लोकांना मदतीची गरज होती, तेव्हा खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता, खेळाडूंना पाहण्यासाठी लोकांना आपल्या जिवाची आहुती द्यावी लागावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अशा घटना घडल्या की त्याचेही राजकारण सुरू होते. भाजपने त्याचाच आधार घेत कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कार्यक्रमांच्या जाहिरात बाजीमुळे होणारी बेसुमार गर्दी आणि त्या गर्दीचे नियोजन करण्यात येणार्‍या मर्यादा, यातून अशा घटना घडतात. त्या टाळण्यासाठी भविष्यात सरकारी यंत्रणा आणि लोकांनीही गांभीर्याने विचार करायला हवा.
 

Related Articles